Wednesday, 28 October 2015

बिच्चारेपणाच्या ओव्या...

राघु गेला परदेशाला घेण्या गरुडभरारी
मैना धावे संसारी मग राघुच्या माघारी

राघुसाठी विजयपताका, राघु की जय बोल
भांडीधुणी स्वयंपाकाचे असते कुठे हो मोल




राघु कसा राघु कुठे हाचि प्रश्न एक
कुणी न पुसशी मैनाबाई, आहेस ना ग ठिक?

मैना होई अन्नपुर्णा अन मैना झाशीची राणी
तीच यशोदा तीच यशदा अन तीच रे नोकराणी

संसाराच्या गाड्याला राघु तुझ्यामुळे रे गती
माझे चाक पिचुन जाइ घरकाम घेऊन पाठी

ना मी सुगरण ना मी जेता ना मी कर्तुत्ववान
मी कुणाच्या लेखी कधीही झाले ना महान

मी म्हणे किती रे पडते मला आताशा काम
तू उंटावरुन हाकसी शेळ्या, कर म्हणे आराम

तुझे लेकरु रडे सारखे, त्याला कुणी पहावे?
घरभर पडले अनंत पसारे, ते कुणी आवरावे?

नको शंभर कामांचेही मजला रे कवतुकं
गप्प बसावे फक्त जगाने झाली एखादी जर चुक

राघु दमला, दमण्यालाही त्याच्या एक झळाळी
मैनाबाई, तुम्हाला तर कुत्रेही विचारत नाही

राघु आणे सोन्याची नाणी, दिपुन जग हे जाई
तुझ्या कष्टाच्या चिल्लरलाही कोण पाहे बाई

जग म्हणे कृतघ्ने, तू राघुमुळे गेलीस परदेशी
राघु कर्ता, मी तर फक्त "डिपेंडंट" व्हिजा वासी..

मैना येती घरात बसशी दमुनी आणि उदास
बाळा पाहुन म्हणे लेका तुझ्यासाठी हा अट्टाहास

लेक नाचे राघुच्या भवती, म्हणे अगं अगं आई
बाबा कधी येणार माझे, मला तू आवडत नाई..

No comments:

Post a Comment