यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण तातडीने मि .पा वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू? पण मग गर्दी पाहून तो घाबरला तर?" असे १०० प्रश्न विचारून सगळ्यांच्या डोक्याची मंडई केली.शेवटी दादाने चिडून "कार काढूया " असे फर्मान सोडले.(तसंही कुणीही शनिवारी सकाळी ७ ची ट्रेन पकडणार नव्हतंच).पण माझ्या वर खापर फोडून सगळे ७ ला निघायचं ठरवून ९ ला कार मधून निघाले.. मागच्या २ दिवसात सगुणा बागेतुनही फोन येऊन गेले होतेच.."कधी येताय? कसे येताय? घ्यायला गाडी पाठवु का स्टेशनवर?" इतकी व्यवस्थित चौकशी त्यांनी केली.